राज्यात बुधवारी कोरोनाबाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील बाधित रुग्णांची संख्या ३३५ वर पोहोचली आहे. बुधवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये ३० रुग्ण मुंबईचे, दोन पुणे आणि बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच तिघांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांचा कुठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी त्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. तर तीन जणांचा मृत्यू झाला. यातील दोन मृत्यू मुंबईतील असून एक व्यक्ती ७५ वर्षीय तर दुसरा ५१ वर्षीचा आहे. तर मृत झालेली तिसरी व्यक्ती पालघरमधील असून ती ५० वर्षीय आहे. मृत्यू झालेले तिन्ही पुरुष असून त्यांचा कुठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. आतापर्यंत राज्यात करोनामुळे एकूण १३ मृत्यू झाले आहेत, असे मंत्री टोपे यांनी सांगितले.
राज्यात आज ७०५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठवलेल्या ७ हजार १२६ नमुन्यांपैकी ६ हजार ४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर ३३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४१ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील
- मुंबई – १८१
- पुणे (शहर व ग्रामीण भाग) – ५०
- सांगली – २५
- मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा – ३६
- नागपूर – १६
- यवतमाळ – ४
- अहमदनगर – ८
- बुलढाणा – ४
- सातारा, कोल्हापूर प्रत्येकी – २
- औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी – १
- इतर राज्य – गुजरात – १
हेही वाचा –
Corona Impact: भाजप नगरसेवकांचे एक महिन्यांचे मानधन ‘पीएम केअर फंड’ला