महाराष्ट्रात बर्ड फ्लूच्या साथीने धुमाकूळ घातला आहे. बर्ड फ्लूमूळे पक्ष्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात समजले. सुरक्षेच्या दृष्टिने स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्या मारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत ३४०० पेक्षा अधिक कोंबड्यांना मारण्यात आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, परभणी जिल्ह्यातील मुरुंबामध्ये मागील आठवड्यात सुमारे ९०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. यानंतर प्रशासनाने कोंबड्यांचा मृत्यू झालेल्या १ किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या मारण्याचा निर्णय घेतला. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री पर्यंत ३,४४३ कोंबड्यांना मारण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे असे म्हटले आहे की, परभणीच्या कुप्ता गावात मृत्यू झालेल्या काही पक्ष्यांचे नमुने परिक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या पक्ष्यांच्या परिक्षणाचे नमुने प्रलंबित आहेत. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, जिल्ह्यात इतर शहरातून बर्ड फ्लूची लागण झाल्याची कोणतेही प्रकरण आढळले नाही. मुरुंबा गावातील सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणे आढळली नाही.
लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी बुधवारी असे म्हटले आहे की, बर्ड फ्लूचा संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी ११,००० हून अधिक कोंबड्या आणि पक्ष्यांना मारण्यात आले. लातूरच्या वंजरवाडीत काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्याचे नमुने परिक्षणासाठी पाठवले आहेत. त्याचे अहवाल अजूनही प्राप्त झाले नाहीत. सोमवारपर्यंत केंद्रेवाडीमध्ये कमीत कमी २२५ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे.