महाराष्ट्रात वाढलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांमुळे आरोग्य खात्याच्या चिंतेत भर पडली आहे. १ जानेवारी ते १३ मार्चपर्यंत स्वाईन फ्लूमुळे मृत्यूंची हाफ सेंच्युरी पूर्ण झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे एकूण ५५ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. नाशिक, नागपूर, पुणे, अमरावती, कोल्हापूर, सातारा या परिसरांमध्ये स्वाईन फ्लूमुळे अनेक मृत्यू झाले आहेत. तर, सर्वाधिक मृत्यू म्हणजे १५ जण एकट्या नाशिक शहरात दगावले आहेत. त्यासोबतच मुंबईतही स्वाईन फ्लूने डोकं वर काढलं आहे.
तापमानाच्या चढ-उतारामुळे राज्यात स्वाईन फ्लू
राज्याच्या वातावरणात होणाऱ्या बदलामुळे तसंच, तापमानाच्या चढ-उतारामुळे राज्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. थंडी आणि ऊन हे वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूंसाठी पूरक असते. त्यामुळे, राज्यातील नागपूर, नाशिक, पुणे, सातारा, अमरावती, अहमदनगर आणि भंडारा या भागांतील ग्रामीण आणि शहरी परिसरात मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या लक्षात घेता अतिदक्षता विभागात रुग्णांवर उपचार कसे करावेत, यावर भर देत मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या गेल्या आहेत. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे आणि अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, अशा रुग्णांवर या मार्गदर्शनानुसार उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू
राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे एकूण राज्यात ५५ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १५ मृत्यू हे नाशिकमध्ये असून ही सर्वाधिक संख्या आहे. त्याखालोखाल नागपूरमध्ये ९ मृत्यू झाले आहेत. पुणे मनपा परिसरात ६ मृत्यू आहेत. तर, अमरावती, पुणे ग्रामीण, बृन्हमुंबई म.न.पा प्रत्येकी ३ मृत्यू आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद, सातारामध्ये प्रत्येकी २ मृत्यू झाले आहेत. सिंधुदूर्ग, अहमदनगर, भंडारा, जळगाव, सोलापूर, वसई-विरार, पालघर, पिंपरी चिंचवड मनपा, आणि बीड या शहरात प्रत्येकी एक अशी स्वाईन फ्लूच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर, राज्यात स्वाईन फ्लूच्या ६७५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
जानेवारी ते मार्च या चालू वर्षात ५२ मृत्यू झाले आहेत. तर, आतापर्यंत ६७५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३ मार्च या कालावधीदरम्यान राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, सर्वाधिक १५ मृत्यू हे एकट्या नाशिकमध्ये झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वेक्षण, निदान व्यवस्था, पुरेसा औषध साठा आणि जनतेचे प्रबोधन या माध्यमातून स्वाईन फ्लूवर नियंत्रण केलं जात आहे.
– डॉ. प्रदीप आवटे, राज्याचे सर्वेक्षण अधिकारी
मुंबईत ४१ रुग्णांची नोंद
मुंबईत ही स्वाईन फ्लू हळूहळू डोकं वर काढलं आहे. १२ मार्चपर्यंत मुंबईत ४१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ५ मृत्यू झाले आहेत. पण, मृत्यू झालेले रुग्ण हे मुंबईचे नसून बाहेरगावहून मुंबईत आले होते. त्यामुळे, मुंबईत एकही मृत्यू झालेला नाही, असं ही महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं आहे. राज्यातील बहुतांश भागात या कालावधीत ग्रामीण भागात यात्रा, जत्रा आणि उत्सवांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी स्वाईन फ्लूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. स्वाईन फ्लू सदृष रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात असून प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वाईन फ्लूवरील प्रतिबंधात्मक असलेल्या टॅमीफ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.