घरमहाराष्ट्रबेस्ट कामगारांचा संप अटळ?; ९८ टक्के कामगारांचा संपाला पाठिंबा

बेस्ट कामगारांचा संप अटळ?; ९८ टक्के कामगारांचा संपाला पाठिंबा

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २६ ऑगस्टला सकाळी ११ वाजल्यापासून कृती समितीचे नेते, कार्यकर्ते आणि बेस्ट कामगार वडाळा आगार येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करणार आहेत.

बेस्ट कामगारांनी विविध मागण्यांसाठी संप करावा का? या मागणीसाठी आज बेस्ट कर्मचाऱ्यांनी मतदान केले. या मतदान प्रक्रियेत ९८ टक्के कामगारांनी संपाला पाठिंबा दिला आहे. तर २ टक्के कामगारांनी संप करू नये, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे येत्या काळातला बेस्ट कामगारांचा संप अटळ आहे, असेच चित्र आजच्या मतदानाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. बहुसंख्य कामगारांचे मत संप करावे असे आहे. त्यामुळे रविवारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोमवार पासून अर्थाच २६ ऑगस्टपासून बेस्ट कर्मचारी संपाला जाणार आहेत. ‘२६ ऑगस्टला आंदोलन करायचे म्हणून औपचारिक आंदोलन केले जाणार नाही. मायबाप मुंबईकरांची माफी मागून गरज पडल्यास नाईलाजास्तव संप केला जाईल’, असे कृती समितीने जाहीर केले आहे. येत्या २६ ऑगस्टला सकाळी ११ वाजल्यापासून कृती समितीचे नेते, कार्यकर्ते आणि बेस्ट कामगार वडाळा आगार येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करणार आहेत.


हेही वाचा – पनवेलमध्ये ६७१ गोविंदांचा थरार; खासगी ६४३ तर सार्वजनिक २८ दहीहंड्या

- Advertisement -

मतदान प्रक्रियेत १७ हजार ९२५ कामगारांचा सहभाग

बेस्टच्या मतदान प्रक्रियेत १७ हजार ९२५ कामगारांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १७ हजार ४९७ कामगारांनी संपासाठी पाठिंबा दिला. तर ३६८ कामगारांनी संप करू नये म्हणून मतदान केले. तर मतदान प्रक्रियेत ६० मते अवैध ठरली आहेत. मतदान प्रक्रियेत १७३१ कामगारांनी ऑनलाईन मतदान केले आहे. त्यापैकी १५८६ मतदारांनी संप करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. बेस्ट कामगार सेनेने मतदान प्रक्रियेत अडथळा आणला होता. तरीही मतदान प्रक्रियेत कामगारांनी सहभाग नोंदवला आहे. याआधी जानेवारीत ९ दिवसांच्या मॅरेथॉन संपाआधीही असेच मतदान घेण्यात आले होते. बेस्ट महाव्यवस्थापक आणि शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी बेस्ट कामगारांना लागू करण्याचे प्रस्तावित केले आहे. तसेच २७ ऑगस्ट पर्यंत वेतन करार करणार असल्याचे जाहीर केले आहे. संप करून कृती समितीने अडथळे आणू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. पण कृती समितीकडून मुख्यमंत्री, मुंबई महापालिका, महापालिका आयुक्त, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक आणि बेस्ट समितीला कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणीचे प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसारखेच सानुग्रह अनुदान जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -