पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही भाजपच्या नेत्यांकडून आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. सभागृहातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे संकट हाताळण्यात ठाकरे सरकारला आलेले अपयश, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा न झालेला वापर, व्हेंटिलेटर्स, एम्ब्युलन्सची कमतरता अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचे फलक घेऊन आमदारांनी विधानभवनाच्या प्रवेशाच्या ठिकाणी पायऱ्यांवर आज आंदोलन केले. पण शिवसेना आमदार आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी चार वर्षे पायऱ्यांवर बसावे लागेल असा चिमटा आंदोलनकर्त्यांना लगावला. पण भाजपकडून सातत्याने घोषणाबाजी सुरूच राहिली.
कोरोना हाय हाय ठाकरे सरकार बाय बाय अशा घोषणा भाजपकडून यावेळी देण्यात येत होत्या. त्याचवेळी आमदार अब्दुल सत्तार हेदेखील विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ आले. भाजपकडून सातत्याने होत असलेल्या घोषणाबाजीनंतरही अब्दुल सत्तार हे विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ पोहचले. त्यांनी थेट गिरीश महाजन यांना उद्देशून चार बोटे दाखवल सांगितले आमच सरकार टर्म पुर्ण करणार आहे. तसेच आमच सरकार हे पाच वर्षे टिकणार आहे असेही अब्दुल सत्तार यांनी गिरीश महाजन यांना यावेळी सांगितले. पण भाजपकडून मात्र सातत्याने घोषणाबाजी सुरू राहिली.
व्हेंटिलेटर्स, एम्ब्युलन्स, डॉक्टर्सच्या कमतरतेमुळे रूग्णांचे नाहक बळी घेणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता कोव्हिड १९ निधीमध्ये जमा झालेल्या रकमेपैकी फक्त एक तृतीयांश रक्कम खर्च करणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो. कोरोना हाय हाय ठाकरे सरकार बाय बाय. कोरोनाच्या महामारीत जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. स्वतः घरात बसून रिमोटने सरकार चालविणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो असेही फलक यावेळी आमदारांना दर्शवत घोषणाबाजी केली.