चांदवड येथे मुंबई- आग्रा महामार्गावर सोग्रस गावाजवळ वाळूचा ट्रक आणि मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. आडगाव शिवारात आज पहाटे ५.५० च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कसा झाला अपघात
वाळूच्या ट्रकमध्ये बिघाड झाल्याने हा ट्रक रस्त्यात उभा होता. यावेळी याच मार्गावरुन जाणाऱ्या लक्झरी मिनी बसचे अचानक टायर फुटल्यानंतर बस ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की ६ जण जागीच ठार झाले, तर १५ जण जखमी झाले. इतर ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्वजण उल्हासनगर व कल्याणचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हे सर्वजण देवदर्शनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे गेले होते. तेथून परतत असताना ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष, एक लहान मुलाचा समावेश आहे.