घरमनोरंजनगलिच्छ राजकारण

गलिच्छ राजकारण

Subscribe

=अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणावर आता आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन गलिच्छ राजकारण केले जात आहे. पण मी संयम बाळगला आहे. या प्रकरणावरुन ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दिली आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

- Advertisement -

मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कोरोना संकटाने देशभर हाहा:कार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे; पण ज्यांना कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणार्‍यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -