वीज ग्राहकांना वीज बिलाच्या तक्रारीसाठी आता पायपिट करत ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर जाण्याची गरज नाही. यापुढे घरबसल्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनच वीज ग्राहकांना आपल्या वीजबिलाची तक्रारी नोंदवता येणार आहे. व्हिडिओ कॉलिंग पर्यायाचा वापर करून आपल्या मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांसाठी अदामी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड सुविधा आणू पाहत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता घरात बसूनच वीज बिलाच्या तक्रारीचे समाधान करता येणार आहे.
कोरोनाच्या संकटाच्या काळात एईएमएलने वीज बिल तक्रारीसाठी ग्राहक तक्रार निवारणासाठी व्हिडिओ कॉलचा पर्याय दिला होता. त्यामध्ये हेल्प डेस्कच्या ठिकाणी १५० कॉल सेंटर एक्झिक्युटीव्हच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले. पण त्यासाठी ग्राहकांना ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर यावे लागत होते. पण येत्या दिवसात मात्र ग्राहकांना घरबसल्याच व्हिडिओ कॉलचा पर्याय एईएमएलमार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक तांत्रिक बाबींचा पाठपुरावा एईएमएलमार्फत सध्या सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढच्या काळात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्या वीज बिलाच्या शंका किंवा तक्रारीचे निवारण करता येईल अशी माहिती एईएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कंदर्प पटेल यांनी दिली.
मुंबईतील २५ लाख ग्राहकांना एईएमएलमार्फत वीजबिल पाठवण्यात येते. पण तंत्रज्ञानाचा वापर करून वीज मीटर रिडिंग पाठवण्यातही ग्राहकांचा सध्या प्रतिसाद नाही. अवघ्या १ टक्का वीज ग्राहकांनी आपल्या वीज वापराचे मीर रिडिंग पाठवले आहे. एईएमएलला एकुण ४८ हजार तक्रारी एकट्या जून महिन्यात आल्या. त्यापैकी ९४ टक्के ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आल्याची माहिती एईएमएलमार्फत देण्यात आली.