तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात सुमारे १ हजार ८०९ पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे तलाठ्यांना प्रवास भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी सांगण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम, संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, उपाध्यक्ष गौस महमंद लांडगे, नाशिक जिल्हा अध्यक्ष निळकंठ उगले, समन्वय महासंघाचे सदस्य तानाजी सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
तलाठ्यांना किमान एक वेतनवाढ मिळावी
सातबारा संगणकिकरण मोहिमेत राज्यातील तलाठ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे तलाठ्यांना प्रोत्साहन म्हणून किमान एक वेतनवाढ मिळावी, अशी मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. तलाठी कार्यालये भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. अशा कार्यालयाना भाडे रक्कम देण्यासंदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केली असून नागपूर विभागासाठी २ कोटी आणि अमरावती विभागासाठी ५ कोटी १३ लाख रुपयांच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. तर ऊर्वरित विभागासाठी लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. तसेच मंडळ अधिकाऱ्यांसाठी सज्जास्तरावरील तलाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी यांनी तयार करून पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
राज्यातील ८० टक्के तलाठींना लॅपटॉप देण्यात आले आहेत. उर्वरित तलाठींना लवकरच लॅपटॉपचे वितरण करण्यात येणार आहे. मंडल अधिकारी, अव्वल कारकून यांची अदलाबदलीने पदे भरण्यासंदर्भातील शासन निर्णयात दुरुस्ती करण्यात येणार असून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षणासाठी धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी टाक्या बसविणार – चंद्रकांत पाटील
हेही वाचा – दुष्काळ निवारणासाठी देशातील सर्वाधिक मदत महाराष्ट्राला – चंद्रकांत पाटील