घरमहाराष्ट्रभाजपच्या आंदोलनावर अजित दादा, बाळासाहेब थोरात संतापले

भाजपच्या आंदोलनावर अजित दादा, बाळासाहेब थोरात संतापले

Subscribe

महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कोरोनाच्या संकटात सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नसल्याची टीका भाजपवर केली आहे. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीने लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणे हा समस्त कोरोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची एकजुटीने लढाई लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचे आणि भाजपचे काहीही भले होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, असेही ते यावेळी म्हणालेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य आव्हानांचा यशस्वी सामना करत असताना भाजपने ‘काळे झेंडे’सारखे आंदोलन करुन महाराष्ट्रातील कोरोना योध्दांचा अपमान करु नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नयेत. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, महाराष्ट्रविरुध्दच्या कटाचा भाग बनण्याचे पाप माथी घेऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ओला’ ला कोरोनाचा फटका; १४०० कर्मचाऱ्यांना काढणार


हे तर भाजप बचाओ आंदोलन

दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील भाजपच्या आंदोलनावर टीका केली असून, महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत. या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून या आंदोलनाचा फास उभा केला जात आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ‘कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका मांडली होती, पण त्यांची कृती मात्र या भूमिकेच्या विरोधात राहिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करायची सोडून पीएम केअरला मदत केली आहे. खरंतर त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीशी भांडायला हवे होते. त्यांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी एखादे मदत पॅकेज मंजूर करून घेतले असते, तर आम्हाला त्याचे अधिक कौतुक वाटले असते. मात्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सरकार बरोबर बोलायचे नाही, त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत, आमचे चुकत असेल तर ते दुरुस्त करायला तयार आहोत, मात्र त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे, संकटातून मार्ग काढण्यापेक्षाही सरकार अडचणीत कसे येईल यात त्यांना अधिक स्वारस्य आहे. खरं तर फडणवीसांची निष्ठा महाराष्ट्रा सोबत नाही ती दिल्लीतल्या भाजपा नेत्यांसोबत आहे, असाही आरोप थोरात यांनी केला. विशेष म्हणजे संकटाच्या काळात भाजपच्या नेत्यांना राजकारण सुचतेच कसे? असा संतप्त सवाल करून ही वेळ राजकारणाची नाही, त्यासाठी आपल्या सर्वांकडे आयुष्य पडले आहे असे थोरात म्हणाले. संकटकाळात भाजपच्या या वागण्याला महाराष्ट्रद्रोहच म्हणावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेला सरकार करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणिव आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी प्राणपणाने लढत आहेत. अशावेळी भाजपकडून सुरू असलेले गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल असे थोरात म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -