‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष सुरुवातीपासून महाआघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रसंगी आम्ही दोन पक्ष ३८ जागांवर लढू पण मित्र पक्षांना १० जागा सोडू, अशी देखील भूमिका आम्ही ठेवली होती. काहींना आम्ही ६ जागा द्यायला तयार होतो. मात्र त्यांनी शेवटच्या दिवसांपर्यंत अनेक कारणे देत महाआघाडीत येण्याचे टाळले. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की, जे महाआघाडीत आले नाहीत ते भाजपची बी टीम आहे’, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकरांचे नाव न घेता लगावला.
५६ पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद
आज महाआघाडीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे ५७ पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप-शिवसेनेविरोधात पुरोगामी लोकशाही आघाडीने रणशिंग फुंकल्याचे जाहीर केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, “भाजपने अनेकांच्या पाठी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. तसेच सत्तेचा गैरवापर करत इतर पक्षांमध्ये तोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे”.
भाजप आणि त्या पक्षांना जनता माफ करणार नाही – अशोक चव्हाण
वंचित बहुजन आघाडीबाबत भाष्य करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, “आमचा प्रयत्न होता की आणखी काही पक्षांनी महाआघाडीत सामील व्हावे. पण भाजपने साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करुन काही पक्षांना आपल्या बाजूने घेतले. भाजप आणि त्या पक्षांना जनता माफ करणार नाही.” अशी टीका चव्हाण यांनी केली.