लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. या प्रचारा दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. ‘बारामतीत मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या सगळ्या अफवा आहेत. घाव करायचा तर तो मुळावरच. ही लढत मैत्रीपूर्ण नाही’, असे शाह यांनी सांगितले आहे. युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.
बारामतीत येणे नियोजनात नव्हते
‘बारामतीमध्ये प्रचाराला येणे माझ्या नियोजनात नव्हते. पण काहींनी ही ‘नुरी’ लढत वाटत होती. पण असे काहीही नाही. या लढतीत कोणतीही तडजोड नसून बारामतीत भाजपाच येणार आहे. यातून महाराष्ट्रात चांगला संदेश जाईल, असेही ते म्हणाले. तसेच पवार, राहुल गांधी, मायावती, उमर आणि फारुख अब्दुल्ला हे एकत्र बसले आहेत. कारण त्यांना भारत आणि काश्मीर यांचे वेगवेगळे पंतप्रधान करायची इच्छा आहे. मात्र, आम्ही जिवंत असेपर्यंत काश्मीरला भारतापासून वेगळं होऊ देणार नाही. आम्ही जेएनयूमध्ये देश विरोधी बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले. तर राहुल गांधी त्यांना भाषास्वातंत्र्य आहे म्हणत भेटायला गेले. मी त्यांना सांगू इच्छितो, राहुल बाबा तुम्हाला देशद्रोह्यांशी ईलू ईलू करायची असेल तर करा, आम्ही करणार नाही’. यावेळी व्यासपीठावर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, रासपचे महादेव जानकर, आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, राहुल कुल, बाबुराव पाचर्णे खासदार संजय काकडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वाचा – राहुल आणि पवारांना फक्त निवडणुकीत शेतकरी आठवतो – अमित शाह
वाचा – पश्चिम बंगालमधून घुसखोरांना पिटाळून लावणार – अमित शाह