तालुक्यातील दुर्गम भागात एसटी हे प्रवासाचे मुख्य साधन असले तरी ठिकठिकाणच्या टुकार व नादुरुस्त रस्त्यांमुळे प्रवाशांना सेवा देताना एसटी मेटाकुटीला आली आहे. त्याचाच प्रत्यय शुक्रवारी सकाळी बोरज फाटा ते देवळे मार्गावर ‘धावणार्या’ बसला आला. त्या ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी टाकण्यात आलेल्या मातीचा चिखल झाल्याने ही बस त्यात फसून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. बसमध्ये ४० प्रवासी होते.
दरम्यान, ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकही बेजार झाले आहेत. रस्त्याची परिस्थिती पावसाळ्यापूर्वी गांभीर्याने विचारात न घेतल्याने एसटीच्या फेर्या वारंवार रद्द करण्याचीही वेळ येत आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरदार, तसेच तालुक्याच्या ठिकाणी सरकारी व अन्य कामासाठी जाणार्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाळ्यातील निसरडे रस्ते, काही फूट खोलीपर्यंतचे खड्डे व त्यात होणारा चिखल हा प्रकार सर्वांनाच नकोसा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणार्या अनेक रस्त्यांची होणारी दुर्दशा केव्हा थांबणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.