ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालच्या नियुक्तीसाठी उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून येत्या ८ किंवा ९ फेब्रुवारी पर्यंत जर निर्णय घेतला नाही तर माझा पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा इशाराच अण्णा हजारे यांनी दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून अण्णांच्या मागण्यांचा विचार करण्याची मागणी केली असताना मनसेप्रमुख राज ठाकरे मात्र उद्या प्रत्यक्ष राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेणार आहेत.
अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. अण्णांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याचे महाजन यांनी सांगितले असले तरी अण्णा आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेचे राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट देखील निष्फळ ठरली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपण अण्णांना भेटणार असल्याचे जाहीर करत अहमदनगरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. उद्या ते अण्णांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील.