शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आज दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास मातोश्रीवर जाणार आहेत. याठिकाणी ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, या भेटीत जालनातील निवडणुकांबाबत एखादा महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खोतकर जालन्यातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत आग्रही असल्याचं समजत आहे. दरम्यान, खोतकर आणि ठाकरे यांच्या भेटीनंतर जालन्यातील जागेबाबतचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सेना-भाजप युतीनंतर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यापैकी नक्की कोण जालन्यातून निवडणूक लढवणार? असा मोठा प्रश्न उभा राहिला होता. युती झाल्यानंतर आपण राव साहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढणार अशी भूमिका राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घेत जालनाच्या जागेवर दावा केला होता.
मात्र, जालन्यातून अखेर दानवे यांचीच उमेदवारी जाहीर झाल्यामुळे खोतकर चांगलेच नाराज झाले आहेत. यावरच चर्चा करण्यासाठी ते आज मातोश्रीवर येणार आहेत. दरम्यान, खोतकर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्यात यशस्वी ठरतील आणि युती धर्म म्हणून दानवे यांच्या प्रचारात सहभागी होतील, असं बोललं जात आहेत.