कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, त्याच धर्तीवर मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणाला परवानगी देण्यात यावी’, अशी मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काही अटी आणि शर्थीवर यंदा गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्याच दरम्यान, येत्या १ ऑगस्ट रोजी ईद उल अदहा म्हणजे बकरी ईद हा मुस्लिमांचा एक महत्त्वाचा सण आहे. कोरोनाच्या संकटामुळे धार्मिक उत्सवांवर अनेक प्रकारचे निर्बंध असल्याने हा सण कसा साजरा करायचा याबाबत मुस्लिम समाजात संभ्रम आहे. त्याच पार्श्वभूमीवर नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी बकरी ईदबाबत आणि कुर्बानी करण्याच्या व्यवस्थेविषयी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले नसीम खान?
‘बकरी ईद हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी कुर्बानी देणे अनिवार्य असते. हा सण जवळ आल्यानंतरही सरकारने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुस्लिम समाज आणि संघटनांमध्ये अस्वस्थता आहे,’ असे नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे. ‘सरकारने काही अटी शर्थीच्या आधारे गणेशोत्सवास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे बकरी ईदलाही परवानगी दिली जावी, तसेच कुर्बानीतून सूट दिली जावी,’ असे खान यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – नाशिककरांना औरंगाबाद, पुण्यात ‘नो एन्ट्री’