घरमहाराष्ट्रभंडारा दुर्घटनेनंतर सरकारला जाग; राज्यातल्या सर्व रुग्णालयांचे Fire Audit!

भंडारा दुर्घटनेनंतर सरकारला जाग; राज्यातल्या सर्व रुग्णालयांचे Fire Audit!

Subscribe

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप १० बालकांचा बळी जाण्याच्या मन सुन्न करणाऱ्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत. मात्र, तरीही रुग्णालयाच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड चालणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट व्यवस्थित झाले आहे का, ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. घटनेची विस्तृत माहिती घेऊन वाचलेल्या बालकांच्या उपचारांत कोणतीही हयगय होणार नाही, हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

मरण पावलेल्या १० बालकांच्या पालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली. तसेच या आगीत कुणी जखमी झाले असल्यास त्यावर देखील उपचार करण्यात यावेत, असेही त्यांनी जाहीर केले.

- Advertisement -

जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई

या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सात बालकांना वाचविले आणि आग पसरू नये, म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यामुळे संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पण ही घटना मन सुन्न करणारी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, ‘कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु:ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन त्यांच्या या दु:खात सहभागी आहे. पण इतकेच करून चालणार नाही. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांची चौकशी करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यास मी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री दोघानांही सांगितले’ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नागपूरच्या अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ आणि विद्युत विभागाचे अधिकारी भंडारा येथे उपस्थित असून ते आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत. या इमारतीतील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण २०१५ मध्ये झाले होते. मात्र त्याचे ऑडिट पूर्ण झाले होते किंवा नाही आणि झाले नसेल तर का झाले नव्हते याविषयी संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई लगेच करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -