राज्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला असून आतापर्यंत अनेक कोंबड्या, कावळे, पोपट मृतावस्थेत आढळले. मात्र आता चिंताजनक बाब म्हणजे नांदेडमध्ये अचानक शेकडो मधमाशांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बर्ड फ्ल्यूमुळेच या मधमाशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘बर्ड फ्लू’मुळेच या मधमाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नांदेडच्याच चिंचोर्डी गावात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मधमाशांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचोर्डीमध्ये तीन पोल्ट्री व्यावसायिकांच्या १०० कोंबड्या दगावल्या होत्या. कोंबड्यांना दफन करून याबाबतची सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्याचेही माहिती मिळतेय.
राज्यातील परभणीसह मुंबई, ठाणे, रत्नागिरीतील दापोली आणि बीडमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बीड आणि परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्याचा मृत्यू झाला होता. भोपाळच्या प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रत्नागिरीतील दापोली आणि मुंबईतील चेंबूरमधील कावळ्यांचा आणि ठाण्यातील पोपटांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचंही प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले असून राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.