शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत युतीची चर्चा नाही, असे जाहीर केले होते. पण आजपर्यंत ना राम मंदिराचं बांधकाम सुरू झाले, ना दुष्काळग्रस्तांना भरीव मदत मिळाली. तरीही नेमकी काय चिरीमिरी घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपशी मांडवली केली, याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. भाजपने ‘ईडी’ची भीती दाखवून शिवसेनेला या युतीसाठी भाग पाडले असावे, अशी माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत समोर बसलेल्या १२० पत्रकारांना उत्तर देणं ज्यांना जमलं नाही; ते महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला कोणत्या तोंडाने उत्तर देणार? #GolmalReturns https://t.co/25kUfVfCPv
— R Vikhe Patil (@RVikhePatil) February 18, 2019
युतीला टोला लगावला
नुकतीच युतीची घोषणा झाली असून याबाबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सेना-भाजपवर सडकून टीका केली. भाजप-शिवसेना युतीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील हा आरोप केला. यासंदर्भात ते म्हणाले की, भाजपशी युती करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने पुन्हा एकदा ‘मांडवली’ हाच आपला एकमेव आणि एक कलमी कार्यक्रम असल्याचे सिद्ध केले आहे. चारच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपला निर्लज्ज म्हटले होते. ‘चौकिदार चोर है’, चा नाराही त्यांनी बुलंद केला होता. अगदी आजसुद्धा सामनाच्या अग्रलेखात भाजप पुलवामातील शहिदांच्या मढ्यावरचे लोणी खात असल्याचे शिवसेनेने म्हटले होते, याकडेही विरोधी पक्षनेत्यांनी लक्ष वेधले.
एकमेकांवर टीका केली
शिवसेना तर शिवसेना पण ‘पार्टी विथ डिफरन्स’ची वल्गना करणाऱ्या भाजपनेही स्वाभिमान गहाण ठेवल्याचे या युतीतून स्पष्ट होते. आजचे भाजपचे दोन्ही सर्वात मोठे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांवरही शिवसेनेने वारंवार पातळी सोडून टीका केली. आपल्या राष्ट्रीय नेत्यांचा इतका जाहीर अपमान झाल्यानंतरही भाजपला शिवसेनेच्या दारात जावे लागले, यातून त्यांची पराभूत मानसिकता स्पष्ट होत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
ही तर जनतेची मोठी फसवणूक
जे कालपर्यंत एकमेकांची औकात काढत होते, जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा करीत होते, तेच आज पुन्हा केवळ सत्तेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालायला निघाले आहेत. ही युती महाराष्ट्राच्या जनतेची मोठी फसवणूक आहे. पण महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. अशा अनैतिक, अभद्र आणि स्वार्थी, मतलबी युतीला धडा शिकवायचा, हे जनतेने अगोदरच ठरवून टाकले आहे, असा इशाराही विखे पाटील यांनी यावेळी दिला.