लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारे अडकली आहेत. यातून बाहेर पडण्याचा रस्ता त्यांना दिसत नाही. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांनी या चक्रव्यूहातून बाहेर पडत राज्य सरकारला रस्ता दाखविण्याची गरज आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून आपली दुकाने सुरु करा, रिक्षा सुरु करा, बकरी ईद आणि रक्षाबंधन साजरे करा, असे आवाहान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी केले. तसेच आपल्या घरावर जो रंग आवडतो त्या रंगाचा झेंडा लावून आम्ही लॉकडाऊन पाळणार नाहीत, हे सरकारला दाखवून द्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊन झुगारून लावण्याच्या आवाहनाबद्दल सरकारला जर मला तुरुंगात टाकायचे असेल तर त्यांनी खुशाल टाकावे, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनचा विरोध केला. देशातील ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडिज तयार झाल्या आहेत. तर १५ टक्के लोकांना औषधांची गरज आहे. तर ५ टक्के लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पाच टक्के लोकांची प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. मात्र त्यामुळे इतर ९५ टक्के लोकांना वेठीला धरणे चुकीचे असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. पाच टक्के लोकांना वाचविण्यासाठी इतर ९५ टक्क्यांमधील लोक भूकबळी आणि इतर आजारांनी मरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘भाजपला लग्नाची घाई पण फडणवीसांना नवरीच मिळेना’ – प्रकाश आंबेडकर
महाविकास आघाडी सरकार टीकणार की पडणार? भाजप सत्तेत येणार का? हे प्रश्न आता नवीन राहिलेले नाहीत. पण या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले उत्तर सध्या चांगलेच चर्चेत आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर यांना राज्यात मिशन लोटस सुरु असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता, यावर ते म्हणाले की, “भाजपला लग्न करण्याची घाई झाली आहे. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीसला नवरी पाहीजे, पण ती काही मिळत नाही. ज्यादिवशी देवेंद्र फडणवीस यांना नवरी मिळेल, त्यादिवशी महाविकास आघाडी सरकारचा निकाल लागेल.” आता ही नवरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून मिळणार का? यावर मात्र आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
पंतप्रधान मोदी राजकीय नाही तर धार्मिक नेते
सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे गरीब कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सामान्य माणसाचे जीवन सुरळीत झाले पाहीजे. सराकरने त्यांना आधार दिला पाहीजे होता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या समस्येला प्राधान्य दिले नाही. मी आधीपासून सांगत आलो आहे की, ते राजकीय नेते नसून धार्मिक नेते आहेत.