तळेगावहून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आंबी येथील ब्रिटिश कालीन पूल आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील वाहनचालक पुलावरून वाहतूक करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
नेमके काय घडले?
सवित्तर माहिती अशी की, तळेगाव एमआयडीसीकडे जाणाऱ्या ब्रिटिश कालीन पुलाचा मधला भाग अचानक आज पहाटे कोसळला. नशीब बलवत्तर असल्याने यात कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. दरम्यान, या पुलावरील अवजड वाहतूक गेली पाच वर्षे झाली बंद करण्यात आली होती. पुलाला धोकादायक पूल म्हणून देखील संबंधित प्रशासनाने सांगितले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या वाहनांना वाहतुकीस मज्जाव करण्यात आला होता. हा ब्रिटिश कालीन पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता. तळेगाव एमआयडीसी असल्याने हजारो नोकरदार वर्ग या पुलावरून वाहतूक करत होते. मात्र, मुख्य रस्त्यावरील हा पूल कोसळल्याने आता तळेगाव एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी मोठा वळसा मारून जावे लागणार आहे. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास पहिल्या शिफ्टमधील काही बस या पुलावरून गेल्या असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे. त्यानंतर हा पूल कोसळला यामुळे मोठा अनर्थ टळला, तर रात्रीच्या सुमारास हा पूल कोसळून दुर्घटना झाली असती, असे ही नाकारता येत नाही.
हेही वाचा – आजपासून ठाकरे सरकारची विदर्भात पहिली परीक्षा