मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. केसरकर यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक घेतली असून मोर्चेकऱ्यावंर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी होत होती. पोलिसांवरील हल्ले आणि तत्सम गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान दिली होती. त्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर तसेच डॉ. रणजित पाटील या उपसमितीचे सदस्य आहेत.
काय म्हणालेत केसरकर
मोर्चेकऱ्यांवरील मागे घ्यावयाच्या गुन्ह्यांबाबत पोलीस महांचालकांकडून प्राप्त झालेला अहवाल विधी आणि न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. येत्या आठ – दहा दिवसात पहिल्या टप्प्यातील अभिप्राय मिळाल्यानंतर उपसमितीची बैठक घेतली जाईल. त्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हे मागे घेण्यात येतील, असे केसरकर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा – मराठा मोर्चा; दिलेला शब्द पाळा, नाहीतर सत्तेची मस्ती उतरवू