करोना व्हायरसने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात ४४६ वर गेली आहे, तर देशात सर्वात जास्त रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात १०१ जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. करोना साथीच्या दुसऱ्या स्टेजमध्ये सध्या महाराष्ट्र आहे, असे असले तरी ही आकडेवाडी आणि स्थिती चिंताजनक आहे. लोकसंख्येची घनता पाहता जास्तीत जास्त लोकांची करोना चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या केवळ लक्षणे असणाऱ्यांना आणि परदेशातून प्रवास अथवा करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचीच तपासणी होत आहे. त्यामुळे नेमकी आकडेवारी मिळण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची वैद्यकीय चाचणी करण्यात यावी आणि या चाचण्यांचा खर्च केंद्र शासनाने करावा अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
देशावर आलेल्या कोरोना व्हायरस ह्या संकटाला मात देण्यासाठी माझी केंद्र सरकारकडे मागणी आहे की, देशातील प्रत्येक राज्यातील रुग्णांचा टेस्टिंग आणि औषधांचा खर्च केंद्र शासनाने उचलावा.@OfficeofUT @ANI@PTI_News @PMOIndia#COVIDIDIOTS #coronavirus pic.twitter.com/M6TfXWCnn8
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 24, 2020
आव्हाडांनी कोणत्या मागण्या केल्या?
पूर्ण देशातली परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. महाराष्ट्राने कार्य उत्तम सुरू केले, शेवटच्या घटकापर्यंत आपण पोहोचलो आहोत, असे आव्हाड म्हणाले. मात्र ज्या गरिबांना करोनाची लागण झाली आहे अशांना तपासणीचा खर्च परवडणार नाही. करोना तपासणीचा खर्च ४ हजार ५०० रुपये असल्याने गरीब लोक पैशांअभावी आपला आजार आणि लक्षणे लपवतात, त्यामुळे हे जास्त हानिकारक आहे. जर आपण याला राष्ट्रीय आपत्ती समजतो तर केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला दोन ते पाच हजार कोटी रुपये द्यावेत, आणि प्रत्येक रुग्णाचा खर्च केंद्र सरकारने करावा. त्याचप्रमाणे लोकांना विश्वासात घेऊन रोग आणि लक्षणे लपवू नका अशी जनजागृती करावी लागेल. पुढे ते म्हणाले आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहे, तेव्हा त्यांनी करोनाच्या साथीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावं,आणि करोनाच्या तपासणीचा खर्च तसेच रुग्णांच्या औषधांचा खर्च केंद्र सरकारने करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.