अनेकदा आगाऊमध्ये आरक्षित केलेली तिकेट प्रवाशांना काही कारणास्तव रद्द करावी लागतात. तसेच तिकीट रद्द केल्यामुळे रेल्वेकडून देखील एक ठराविक रक्कम कापली जाते. या कापलेल्या रक्कमेतून रेल्वेला चक्क कोटींचा महसूल प्रात्प झाला आहे. २०१८ या एका वर्षात एक कोटीहून अधिक लोकांनी तिकीटे रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. या रद्द केलेल्या तिकीटातून रेल्वेला १५२ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला असून तात्काळ तिकीटातून १४७ कोटी मिळाले असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.
मध्य रेल्वेला हे विचारण्यात आले होते प्रश्न
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी माहितीच्या अधिकारात मध्य रेल्वेकडे विचारणा केली होती. २०१८ मध्ये मध्य रेल्वेला किती महसूल प्राप्त झाला? तिकीटे रद्द केल्यामुळे मिळालेला महसूल, रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारणा केली होती. तसेच रेल्वेने अशा प्रवाशांकडून किती दंड वसूल केला, या कालावधीत किती भिक्षेकरी आणि तृतीयपंथींयांवर कारवाई झाले आहे? हे प्रश्न विचारण्यात आले होते.
१ कोटी प्रवाशांनी रद्द केली तिकीट
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १ कोटी ४७ लाख ७४ हजार ६२३ लोकांनी तिकीट रद्द केले होते. त्यातून रेल्वेला १५२ कोटी २५ लाख ८४ हजार ९३८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. याशिवाय तात्काळ तिकीटांमधून १४९ कोटी २९ लाख ६७ हजार ४८८ रुपयांचा महसूल मिळाला आहे. ‘प्रीमियम’ तिकिटांपोटी ८३ कोटी ८३ लाख ७२ हजार ५७४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर नागपूर विभागाला विविध माध्यमांतून २०१८ या वर्षात मध्य रेल्वेला ३६ कोटी ६९ लाख ८९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
तृतीयपंथी आणि भिक्षेकरांवर कारवाई
वर्षभरात २४२ तृतीयपंथींयावर कारवाई करण्यात आली असून २०१८ मध्ये तृतीयपंथीयांकडून ३ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर १८ भिक्षेकऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा – दुसर्या प्रवाशाच्या नावे ट्रान्सफर करता येणार तिकीट
वाचा – एसी लोकलची तिकीट सवलत बंद होणार?