कोल्हापूर-सांगली या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती नियंत्रणात येत असताना आता तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरातून स्वयंसेवी संस्था, इतर जिल्ह्यांमधील स्थानिक तसेच विविध पातळीवर पूरग्रस्तांच्या मदतीचा ओघ सुरू आहे. काही राजकीय पक्षांनीसुद्धा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सूचनांमार्फत आवाहन केले आहे. त्यानुसार भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एका महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचनाच चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यावेळी भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी किमान १०० रूपयांची मदत पक्षाकडे जमा करावी असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
निधी संकलनाचे आवाहन
भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. तेथील जनतेच्या बचावासाठी सरकारने प्रभावी काम केले आहे. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाचे अवघड आव्हान आहे. ते पेलण्यासाठी भाजपने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना निधी संकलनाचे आवाहन केले आहे.
हेही वाचा – ‘राज्यातील पूरपरिस्थितीचे संकुचित राजकारण करण्याचा प्रयत्न आहे’
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समिती नेमणार
आज चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची सूचना केली. ”सर्व लोकप्रतिनिधींनी ‘भारतीय जनता पार्टी, आपदा कोष’ नावाने आपले चेक किंवा ड्राफ्ट द्यावेत,” अशी सूचना त्यांनी केली. तसेच, ”भाजपच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर रुपये तर कमाल हवे तितके योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे,” असेही ते म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी, ”भाजपतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होणाऱ्या कार्यासाठी ‘भाजप महाराष्ट्र पूरग्रस्त सहाय्यता संयोजक’ म्हणून माजी प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार लवकरच समितीची स्थापना करण्यात येईल,” असेही ते यावेळी म्हणाले.