शिवसेना पक्षप्रमुख उद्धंनी पंढरपूरच्या सभेत टीकास्त्र सोडल्यानंतरही भाजप युतीबाबत आश्वासक असल्याचे दिसून आले. नागपुरात आज, सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे यांनी भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी, अशी राज्यातील जनतेची इच्छा असल्याचे सांगितले. तसेच युतीच्या जागा वाटपाबद्दल अद्याप चर्चा सुरू झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे आणि चंदन गोस्वामी उपस्थित होते. यावेळी दानवे म्हणाले की, समविचारी पक्षाशी युती व्हावी, हे भाजपचे सुरुवातीपासून धोरण आहे.
राफेल घोटाळ्याप्रकरणी केले वक्तव्य
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतविभाजनाचा लाभ मिळू नये म्हणून भाजप – शिवसेनेची युती होणे आवश्यक आहे. राफेल घोटाळ्याबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांविषयी दानवे यांना विचारले असता आता न्यायालयाचा निर्णय आला आहे, त्यामुळे विषयच उरला नाही, असे ते म्हणाले. सोबतच ९० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी १९ आणि २० जानेवारी रोजी नागपुरात भाजपतर्फे अनुसूचित जाती – जमातीचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. समारोपाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मार्गदर्शन करतील, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.