घरमहाराष्ट्र'त्या' मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

‘त्या’ मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

Subscribe

धुळे जिल्ह्यातील मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. सोशल मीडीयातील अफवांमुळे केवळ संशयातून गावकऱ्यांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना बेदम मारले होते. या मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

राज्याला हादरवून सोडणाऱ्या धुळे जिल्ह्यातील मारहाण प्रकरणी मृत्यूमुखी पडलेल्या पाचही जणांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील ट्रॉलीच्या उद्घाटनावेळी पत्रकारांशी बोलताना ही मदत जाहीर केली. सोशल मीडीयातील अफवेमुळे काल, १ जुलै रोजी धुळ्यातील राईनपाड्यात मुलं पळवण्याच्या संशयातून पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. गावकऱ्यांनी मिळून त्या संशयीतांना जीव जाईपर्यंत मारले होते. या घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त होत होती. त्याचीच दखल घेत आज मुख्यमंत्र्यांनी त्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली.

२३ जणांना ताब्यात घेतले

राईनपाडा गावात मुलं पळवणारी टोळी शिरल्याची अफवा पसरल्यावर सोलापूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील पाच जणांना गावात जमावानं अमानुष मारहाण केली. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून आणखी काहींची ओळख पटल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या गावकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं रवाना केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर गावात शांतता पसरली असून गावातील पुरुष फरार असल्याचे समजते.

- Advertisement -

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

दरम्यान, अमानुषपणे मारहाण झालेल्यांचा मृतदेह स्विकारण्यास त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. सर्वानुमते जो निर्णय होईल त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात येतील असा निर्णय मृत भारत भोसले यांचा मुलगा संतोष भोसले याने सांगितले आहे. पाचही मृतांचे शवविच्छेदन मध्यरात्री करण्यात आले. मृतदेह रात्रीच कुटुंबियांनी ताब्यात घ्यावे, असा प्रयत्न पोलीसांचा होता. मात्र कुटुंबियांनी त्याला स्पष्ट नकार दिला.

मदतीची मागणी

धुळे मारहाण मृत्यू प्रकरणी पचंवीस लाखाची मदत आणि सरकारी नोकरीच्या आश्वासनासह, सरपंच तसंच ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या कुटुंबियांनी केली होती.

अफवांचे आणखी ५ बळी.. हे सत्र थांबणार कधी?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -