घरमहाराष्ट्रमित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश

मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी जागा सोडली नाही म्हणून मित्रपक्ष नाराज होते. या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात मित्र पक्षांना जागा सोडण्यात न आल्यामुळे मित्रपक्ष भाजपा आणि शिवसेनेवर नाराज होते. अखेर या नाराज मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाला सन्मानजनक जागा देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मित्र पक्षाची नाराजी दूर झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षचे (रासप) राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महादेव जानकर यांनी बैठकीनंतर दिली. रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल आजपासून भाजपात असतील आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्या प्रचाराला जाणार असे जानकर यांनी यावेळी सांगितले. तसेच सध्या नाही पण विधानसभेत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. घटकपक्षांवर अन्याय होणार नाही, योग्य तो सन्मान आणि भागीदारी दिली जाईल, असे आश्वसन मुख्यमंत्र्यांनी यावेळी घटक पक्षाना दिले.

युतीच्या सभेला मित्रपक्षही जाणार

दरम्यान, उद्या म्हणजे रविवारी कोल्हापूरमधून युतीच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह घटकपक्षांचे सर्व नेतेही उपस्थित असतील असे जानकर यावेळी म्हणाले. शिवसेना आणि भाजपने आतापर्यंत बहुतांश जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. पण आम्हाला सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची रासपची तक्रार होती. पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जानकरांनी भाजपवर टीका केली होती. शिवाय भाजपला एक दिवसाचा अल्टिमेटमही दिला होता. पण त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सर्व मित्र पक्षाची समजूत घातली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -