मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरी शैलीत टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO ही मार्गदर्शनासाठी बोलावू शकते असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रात पुरेशा चाचण्या होत नाहीत, कोरोनामुले होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे, कयारोनावर उपाय योजना करण्यात सरकारला अपयश आलंय, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांना विचारलं असता देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. बडी आसामी आहे. त्यांना कदाचित WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावतील असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या एबीपी माझाच्या कार्यक्रमात त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं, त्याचा वेग मंदावणं हे महत्त्वाचं आहे. शिवाय गर्दी टाळा, सतत हात धुवा, मास्क लावा हे सगळे नियम पाळा असं वारंवार सांगितलं जातं आहे. आपण सध्या अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये आहोत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करावं लागलं. कारण त्या ठिकाणी कोरोनाचं संक्रमण वाढलं होतं. त्यामुळे तिथे लॉकडाऊन करावा लागला असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आपण निर्णय घ्यायचा असतो आणि प्रशासनाकडून काम करुन घ्यायचं असतं. तसंच चष्मा लावायला हरकत नाही पण डोळ्यावर झापडं लावू नका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपण कोरोनाच्या काळात रुग्णालयं उभारली आहेत, आवश्यक त्या सगळ्या उपाय योजना केल्या असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.