देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहयला मिळाला. मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सायबर पोलीस ठाणे उद्घाटन सोहळा झाला. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पाच विभागीय सायबर पोलीस ठाण्यांचे ॲानलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. याचबरोबर 94 पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षांचे उद्घाटनदेखील केले.
गुन्हेगारांचा शोध लावणे, त्याच्यावर वचक बसवणे, सायबर क्षेत्रातील गुन्हेगारीच्या विश्वात धाक बसवणारं कदाचित आपल्या देशातील मुंबई हे पहिलं शहर असेल.
The Mumbai Police is perhaps the only Police force in India that is cracking down cyber crimes. pic.twitter.com/5hcgeJilEJ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 26, 2021
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाला, कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रुपाने उपलब्ध आहे, आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. सायबर क्राईम डोळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपले युद्ध अधिक सक्षमतेने आता सुरु झाले आहे, पोलीस घड्याळ हातात घालून काम करतो पण त्याला काळ वेळेचे भान न ठेवता काम करावे लागते. गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. मोबाईल फोनचा दुरुपयोग वाढतो आहे, आपल्याच साधनांचा उपयोग करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगाच्या पाठीवरचा कुणीही कुठेही बसून आपल्या घरातील माहिती, पैसे आणि इतर गोष्टींची चोरी या माध्यमातून करू शकतो, असे असले तरी या गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या उद्घाटन सोहळ्याला गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,पोलीस आयुक्त परम बीर सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित.
सायबर क्राईम सेक्युरिटी प्रकल्प लवकरच- गृहमंत्री अनिल देशमुख
माहिती तंत्रज्ञानाने जग व्यापल असतांना ऑनलाईन माहितीची देवाण घेवाण, आर्थिक व्यवहार होतात. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. त्यांचे प्रमाण इतर गुन्ह्यांएवढे वाढत आहे. महाराष्ट्रातही हे प्रमाण आणि प्रकार वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आल्याचा आनंद आहे. 900 कोटींचा सायबर क्राईम सिक्युरिटी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करु. या माध्यमातून सायबर क्राईम थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. पोलिसांसाठी घरे हा महत्वाचा विषय आहे, एक लाख घरे पोलिसांसाठी बांधता येतील. हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले.
सायबर युद्धात आधुनिक तंत्रज्ञानासाठी पोलिसांच्या पाठीशी- आदित्य ठाकरे
संविधानानुसार देश कसा चालतो हे सांगणारे कोण तर ती खाकी. मला त्यांचा अभिमान वाटतो. अशा शब्दात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याची भूमिका महत्वाची असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. स्वागत कक्षाच्या माध्यमातून मायेची आणि आपलेपणाची उब जाणवेल, असे सांगून त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
लोकांनी सायबर गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे यावे -गृहराज्य मंत्री सतेज पाटील
मुंबई पोलीस तत्पर तपासासाठी जगभर प्रसिद्ध आहे. नवनवीन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आले असल्याचे सांगून लोकांनी सायबर गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे यावे, तुमचे गुन्हे सोडवण्यासाठी, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस तुम्हाला तत्परतेने मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तक्रारी नोंदवण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील – मुंबई पोलीस आयुक्त
सर्वसामान्य माणसं जेंव्हा पोलीस स्टेशनला येतात तेंव्हा त्यांना त्यांचे प्रश्न व्यवस्थित मांडता यावेत यासाठी स्वागत कक्ष तयार करण्यात आला आहे यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हा कक्ष त्यांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असे त्यांनी सांगितले.