राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्याला घेण्यात येते. त्यामुळे या बैठकीत बरेच निर्णय देखील होतात. मात्र, ‘या बैठकीत होणाऱ्या चर्चा बाहेर सांगू नका,’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना ताकीद दिली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. परंतु, असे असताना देखील मंत्रिमंडळात होणाऱ्या चर्चांचे फोटो बाहेर पडल्याने उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
यामुळे अधिकारीही चक्रावले
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व अधिकाऱ्यांना बाहेर थांबण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच अशा सूचना दिल्याने सर्वच अधिकारी चक्रावून गेले. त्यांच्या अशा सूचनांमुळे अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, त्या दरम्यान मुख्यमंत्री बंद दाराआड मंत्र्यांचा एक्स्ट्रा क्लास घेत होते. जवळपास तासभर ही शाळा सुरु होती.
काय घडले बंद दाराआड?
मंत्रिमंडळ आणि इतर बैठकांमधील चर्चा बाहेर फुटत आहेत. त्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. त्यामुळे बैठकीत गुप्तता राहणे फार महत्त्वाचे आहे. कारण बैठकीतल्या बातम्या बाहेर फुटल्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचे असल्याने आपल्याला समन्वय आणि जबाबदारीने चालवावे लागणार आहे. त्यामुळे संयम बाळगणे फार गरजेचे आहे. तेव्हा मंत्र्यांनी बैठकीतील महत्त्वाच्या चर्चांविषयी तोंडावर बोट ठेवावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सरकारचे कामकाज वेगाने चालले आहे, असे चित्र दिसले पाहिजे. यासाठी मंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
हेही वाचा – ठाकरे सरकारचा शेतकर्यांना पुन्हा दिलासा