छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे भाजप कार्यकर्ते जय भगवान गोयल आणि त्यांच्या पक्षाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन पुकारले होते. अखेर हे आंदोलन रद्द केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांना दिली. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो की त्यांनी जो रोष व्यक्त केला त्यामुळेच प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून पुस्तक मागे घेतल्याचे म्हटले. याचमुळे आम्ही हे आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच असा प्रकार पुन्हा घडू नये असे सांगत केंद्रीय नेतृत्वाने माफी मागितली पाहिजे ही अपेक्षा असल्याचं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपकडून शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करून तीव्र निषेध केला जाणार, अशी माहिती थोरात यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.
म्हणून भाजप असे मुद्दे घेऊन येतय
दरम्यान देशाची अर्थव्यवस्था बिकट होत चालली आहे. कारखाने बंद पडले एवढेच नाही तर महागाई वाढली तसेच देशात मंदी देखील आहे. डॉ. मनमोहन सिंग असताना देशाची अर्थव्यवस्था नीट होती. मात्र आता ती बिकट होत चालली आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी इतर धार्मिक मुद्दे घेऊन भाजप पुढे येत असल्याची टीका थोरात यांनी यावेळी केली.
हेही वाचा – लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? – उदयनराजे भोसले