भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धीजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षड्यंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्र्यालयाने गुरुवारी याबाबत आढावा बैठक घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराजे देसाई या बैठकीला उपस्थित होते. यासंदर्भात आणखी एक आढावा बैठक होण्याची शक्यता आहे.
पोलीस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली. पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. त्याची खोलात जाऊन चौकशी आवश्यक आहे. कोरेगाव भीमा दंगलीला एल्गार परिषदेतील चिथावणीखोर जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यामधील काही जणांचा माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरुन कारवाई करण्यात आली. कारवाई झाली त्यात ही बुद्धीजीवी आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. म्हणून याप्रकरणी एसआयटी नेमावी,” असे शरद पवार यांनी पत्रात लिहिले आहे.
कोरेगाव-भीमा प्रकरणी तपास यंत्रणेवर आरोप झाले आहेत. विशेषतः पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही जणांना अर्बन नक्षल म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नेमकी कशाच्या आधारावर ही कारवाई झाली, अशीही विचारणा बैठकीत करण्यात आली.
अटक झालेल्या सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची अनुवादीत कविता वाचल्यामुळे त्यांना अटक केली. तर डॉ. आनंद तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. ’गोलपीठा’मध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ती साहित्यिक अर्थाने बोध घेण्याऐवजी ते देशद्रोह आणि समाजविघातक म्हणून निष्कर्ष काढू नयेत, असेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे.