महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची संख्या तीनने वाढून आता ५२ झाली आहे. काल राज्यात ४९ रुग्ण होते. मात्र मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. तसेच पाच रुग्णांची तब्येत बरी झाली असून ते निगेटिव्ह झाले आहेत, अशा पाच रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या पाच रुग्णांना थोडे दिवस घरीच क्वॉरंटाइन केले जाणार आहे. मात्र एकूण रुग्णांच्या संख्येतून या पाच जणांना वजा केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.
गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय घेणार
मुंबई आणि एमएमआर रिजनमधील गर्दी कमी करण्याचे आवाहन करुनही अजूनही पुरेशी गर्दी कमी झालेली नाही. बस आणि ट्रेनमध्ये गर्दी दिसत असल्यामुळे आता काही कठोर निर्णय घेतले जातील, असे सुतोवाच टोपे यांनी केले. आज दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक असून या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित करत असताना २२ मार्च रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्याची सूचना दिली आहे. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी अशाप्रकारचा कर्फ्यू आवश्यक आहे, असे सांगत मोदींच्या आवाहनाला राज्याने पुर्ण पाठिंबा दिला पाहीजे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच आज (दि. २० मार्च) संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पंतप्रधानांशी संवाद साधणार आहोत. प्रयोगशाळांमध्ये करोना चाचणीचे किट्स आणि व्हेटिंलेटरची संख्या वाढविण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
आखाती देशांमधून आलेल्या त्या हजारो लोकांची व्यवस्था झाली
आखाती देशांमधून २६ हजार भारतीय येणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यांना मुंबईत कुठे ठेवणार असा प्रश्न राजेश टोपे यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, तुर्भेमध्ये अनिल अंबानी हॉस्पिटलमध्ये क्वॉरंटाईन सुविधा उपलब्ध केली जात आहे. हॉस्पिटल बांधून तयार आहे, फक्त तिथे काही खाटांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच मुंबईत काही इमारती बांधून तयार आहेत, त्या इमारतींमध्ये क्वॉरंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.