करोना विषाणू चीनमध्ये हाहा:कार माजवत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पण इथे करोना विषाणूच्या निव्वळ अफवेने चिकन विक्रीवर संक्रांत कोसळली असून कुक्कुटपालन व्यावसायिक संकटात सापडले आहेत. करोना विषाणूची भारतात कुठेही लागण झालेली नाही हे शासनाने स्पष्ट केले असले तरीही लोकांच्या मनातील भीती दूर व्हायला मागत नाही. कोरोनाच्या निमित्ताने असुरक्षित व घाणेरड्या पद्धतीने चिकन तसेच अन्य मांसाहारी पदार्थ विक्रीचा मुद्दा मात्र पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे.
करोना नामक विषाणूने चीनसारख्या प्रगत देशापुढे आव्हान निर्माण केले असून अनेक निष्पाप लोकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात मात्र या रोगाची लागण झालेली नसून ती होण्याची शक्यताही धूसर आहे. मात्र सोशल मीडियावर आलेल्या अफवांमुळे लोकांच्या मानगुटीवर या विषाणूचे भूत बसले आहे. या अफवेमुळे चिकन सह अन्य मांसाहारी पदार्थांच्या विक्रीला चांगलाच फटका बसला असून कोंबडी पालन आणि चिकन विक्री व्यवसाय संकटात सापडला आहे.
वाडा तालुक्यातील अनेक शेतकरी कुक्कुटपालन करण्याकडे वळले असून त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. शिवाय तालुक्यातील वाडा, कुडूस, अबिटघर, खानिवली अशा प्रमुख बाजारपेठेत कोंबड्यांची मोठी विक्री होत होती. करोना विषाणूमुळे बॉयलर कोंबडीच्या मांसावर कसे विपरीत परिणाम होतात याचा व्हिडिओ आणि काही मॅसेज सोशल मीडियावर कुणीतरी पसरवल्याने आधीच संवेदनशील असलेल्या खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवायला सुरुवात केली. ग्राहक दुरावल्याने चिकन विक्रीची 70 टक्के घट झाली आहे, असे चिकन व्यावसायिक सांगतात. साहजिकच बॉयलर कोंबड्या पालन करणार्यांच्या व्यवसायावर संक्रांत कोसळली आहे. कोंबड्यांचे दर निम्म्याहून कमी झाले आहेत. चिकन पूर्णपणे सुरक्षित असल्याचा पुरावा संबंधित विभागांनी सादर केला आहे. तरी अजूनही लोक चिकनकडे वळायला तयार नाहीत.
करोनाबाबत अफवा पसरविल्यास एफआयआर
चिकनमुळे करोना विषाणू पसरतो अशी अफवा राज्यात पसरविणार्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत.
चिकन विक्रीमध्ये अचानक घट येऊ लागल्याने आमच्या लक्षात आले की लोकांमध्ये कोरोना विषाणूची भीती आहे. या विषाणूचा चिकनवर काही परिणाम होत नाही. मात्र त्याचा परिणाम आमच्या व्यवसायाला सोसावा लागत आहे. वाडा शहरात आम्ही ज्या सुरक्षित पद्धतीने चिकन विक्री करतोे, ती ठाणे व पालघर जिल्ह्यात कुणीही करीत नसेल. ग्राहकांनी देखील मनात भीती न बाळगता स्वच्छ व सुरक्षित चिकनची मागणी करावी.
-मच्छिन्द्र आगिवले, चिकन व्यावसायिक
चिकन विक्रीमध्ये अचानक घट येऊ लागल्याने आमच्या लक्षात आले की लोकांमध्ये करोना विषाणूची भीती आहे. या विषाणूचा चिकनवर काही परिणाम होत नाही. मात्र त्याचा परिणाम आमच्या व्यवसायाला सोसावा लागत आहे. वाडा शहरात आम्ही ज्या सुरक्षित पद्धतीने चिकन विक्री करतोे, ती ठाणे व पालघर जिल्ह्यात कुणीही करीत नसेल. ग्राहकांनी देखील मनात भीती न बाळगता स्वच्छ व सुरक्षित चिकनची मागणी करावी.
-मच्छिन्द्र आगिवले, चिकन व्यावसायिक