करोनाच्या भीतीने भारतातही काळजी घेतली जात असून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची चौकशी आणि तपासणी केली जात आहे. राज्यात आजही चौघांवर उपचार सुरू आहेत. सध्या प्रत्येकी दोन जण पुणे आणि मुंबई येथे दाखल असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत १०६ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तसेच, १०२ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ४७५ विमानांमधील ५७ हजार ५९२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ३२६ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २२८ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
दरम्यान, केंद्र शासनाच्या नवीन सूचनेनुसार चीनसह हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द.कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या १० देशातील प्रवाशांसोबतच इराण आणि इटलीतील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे, या दहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीचा भार भारतातील यंत्रणेवर आला आहे. राज्यात आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळला नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.