लॉकडाऊनच्या भीतीने गावाला परतत असताना कोल्हापूर येथे झालेल्या भीषण अपघातात पतीसह मायलेक ठार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने घाबरलेल्या एका जोडप्याने बाइकवरून गावची वाट धरली. पण, कोल्हापूरच्या शाहूवाडी येथे त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात या जोडप्यासहीत त्यांचा लहान मुलगाही ठार झाला. हे जोडपे शाहूवाडीतील जांबूर इथे राहत होते.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्जेराव भीमराव पाटील (वय ३३), पूनम सर्जेराव पाटील (वय २७) आणि त्यांचा मुलगा अभय सर्जेराव पाटील (वय ६) हे सर्वजण डोंबिवलीवरून गावी जांबूर येथे मंगळवारी जायला निघाले होते. जायला कोणतंही वाहन नसल्याने त्यांनी दुचाकीवरून गावी जाण्याचा निर्णय घेतला. ट्रिपल सीट निघालेल्या या जोडप्याने कराडपर्यंतचं अंतरही पार केलं होतं. पण, कराडवरून चार-पाच किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर शेडगेववाडीच्या दिशेने जात असताना त्यांचे भरधाव बाइकवरील नियंत्रण सुटले आणि बाइक रस्त्याच्याकडे वरून घसरली. त्यामुळे, तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तात्काळ कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच लहानग्या अभयचा मृत्यू झाला होता. तर, सर्जेराव आणि त्यांची पत्नी पूनम हे दोघेही बेशुद्धावस्थेत होते. बुधवारी उपचार सुरू असताना सर्जेराव यांचा मृत्यू झाला तर पूनम यांची मृत्यूशी झुंज सुरूच होती. दवाखान्यात ३० तासांहून अधिक काळ मृत्यूशी झुंज देणाऱ्या पूनम यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळे जांबूर गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सर्जेराव आणि अभय यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंसंस्कार केले. तर, पूनम यांच्या पार्थिवावर शुक्रवारी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्जेराव यांचे वडील भीमराव पाटील हे मुंबईत गिरणी कामगार होते. गिरणी बंद पडल्यानंतर ते गावाकडे स्थायिक होऊन शेती करत होते. बाजीराव, सर्जेराव आणि राजू या त्यांच्या तीन मुलांपैकी सर्जेराव आणि राजू हे दोघे नोकरीनिमित्त मुंबईत तर थोरला मुलगा बाजीराव वडिलांसोबत गावी राहतात. सर्जेराव पाटील हे गेली दहा वर्ष मुंबई येथे खासगी कंपनीत चांगल्या नोकरीवर होते. पण, अचानक या तिघांच्या जाण्यामुळे गावात शोकाकुल वातावरण आहे.