आज राज्यात १०,७९२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १५,२८,२२६ झाली आहे. राज्यात आज ३०९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,२१,१७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नवीन निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी मृत्यूच्या आकड्यांनी राज्याची चिंता कायम ठेवली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण ३०९ मृत्यूंपैकी १६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९८ मृत्यू नागपूर -२१, रत्नागिरी -१६,पुणे -१३, कोल्हापूर -११, नांदेड -६, सातारा -६, ठाणे -६,सोलापूर -५, सांगली -५, अकोला -२, जळगाव -२, रायगड -२, बीड -१, नाशिक -१ आणि यवतमाळ -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
नवीन बाधित रुग्णांमध्ये ४० टक्क्यांनी घट
– मागील ४ आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता दर आठवडयाला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात १ लाख ५३ हजार ३३१ एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात ९२ हजार २४६ एवढी आहे. याचा अर्थ रुग्ण संख्येत जवळपास ४० टक्के घट झाली आहे.
– १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ७०.७२ टक्क्यांवरुन ८२.७६ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.
– या सोबतच प्रयोगशाळा नमुन्यांमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण हे २४. ६ टक्क्यांवरुन १५.०६ टक्क्यांवर आले आहे.
– मागील चार आठवड्यात प्रयोगशाळा तपासणीत थोडी घट होताना दिसत आहे. याची दोन प्रमुख कारणे आहेत – पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दैनंदिन स्वरुपात कमी होत असल्याने स्वाभाविक या बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या कमी होत आहे आणि फिवर क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी होत असल्याचे निरीक्षण रुग्णालयांनी नोंदविले आहे.
– १० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रतिदिन चाचण्यांची संख्या ८० हजारांच्या घरात आहे. परिणामी १० सप्टेंबर रोजी असणारा पॉझीटिव्हीटी दर हा २४.६० टक्क्यांवरून १० ऑक्टोबर रोजी १५.०६ टक्क्यावर आला आहे.