कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून सार्वजनिक वाहतूक, दुकानं, शाळा, कॉलेज आणि कंपन्या सर्व बंद करण्यात आल्या आहेत. पण असे असतानाही काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. या फिरणार्यांवर सोलापूर पोलिासांनी कठोर कारवाई केली आहे. सात दिवसात तब्बल पाच हजार फिरणार्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. देशात लॉकडाऊन घोषित केला असतानाही काही लोक नियम न पाळत घराबाहेर पडत आहेत. या विनाकारण फिरणार्यांना बर्याचदा घराबाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु कुणी ऐकत नसल्याने पोलिसांनी 23 ते 30 मार्च दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विनाकारण मोटारसायकलवर फिरणे, अफवा पसरविणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही लोकांवर कोरोना संबंधित सोशल मीडियावर अफवा पसरवल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागिरक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.