राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले असून, शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, वडिलांना वाटते आपल्या मुलांना काही कळत नाही. म्हणून ते माझ्याबद्दल बोलले असतील. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तशीच भावना असते. त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. कदाचित माझ्या खांद्यावरुन त्यांना वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर निशाणा साधायचा असेल अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच तुम्ही देखील काही तरी करा असे त्यांना सांगायचं असेल असे फडणवीस यावेळी म्हणालेत. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवशीय कोकण दौऱ्यावर आहेत.
कोकणासाठी साडेसात हजार कोटींचं पॅकेज द्या
“राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळाचे नुकसान झालेल्या जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. कोकणासाठी किमात सात ते साडेसात हजार कोटींचं पॅकेज द्यावं तरचं कोकण पुन्हा उभारता येईल,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी कोकण दौऱ्यावर निघण्यापूर्वी केली.
“सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे. आम्ही सातत्याने सांगत आहोत की नुकसान अत्यंत मोठं आहे. सरकारसमोर मागील वेळेला कोकण आणि कोल्हापूरसाठी केलेली मदत त्यांच्यासमोर आहे. आम्ही चालू कर्ज माफ केली होती. त्याच्या तीन पट पैसे दिले होते.”
“आता फळबागांचं नुकसान झालं आहे. त्यावेळी आपण पिकालाही तीन पट पैसे दिले होते. ते असं भरुन काढता येणार नाही. त्यासाठी आपल्याला झाडांचा विचार करुन पैसे द्यावे लागेल.”आम्ही १५ हजार रोख द्या ही मागणी केली होती. ती सरकारने मान्य केली नाही. भांड्या कुंड्यासाठी अत्यंत तोकडी मदत सरकार देत आहे. फक्त दोन तीन ठिकाणी त्यांनी पैसे वाढवले आहेत. घरांसाठी आपण प्रधानमंत्री आवास योजनेला जेवढे पैसे मिळतात. शहरात ग्रामीण भागात त्याशिवाय sdrf असे मिळून आपण जर विचार केला तर ग्रामीण भाग तीन लाख तर शहरी भागात चार लाखापर्यंत पैसे दिले होते.” आता सरकारने सर्व मिळून दीड लाख दिले आहे. त्यामुळं लोकांचे घर कशी बनतील. त्यामुळे सरकारने एकूण जे पॅकेज दिले आहे. ते अत्यंत तोकडं पॅकेज आहे, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी शरद पवारांच्या टोल्याला उत्तरं देताना देवंद्र फडणवीस म्हणाले की, आघाडीतील तिन्ही पक्षांनी थोडेसे मॅच्युअर वागण्याची गरज आहे. कोरोना, चक्रीवादळ अशी संकटं असताना आपापसात भांडणं योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष आहे. त्यांनी सध्या सगळा फोकस हा कोरोना आणि आता वादळाने झालेलं नुकसान याकडे दिलं पाहिजे. शासन आणि प्रशासन वाद योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले. ८१ वर्ष वय असताना शरद पवार फिरत आहेत. कदाचित हे काम करत नसतील म्हणून त्यांना फिरावं लागत असेल, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
हे ही वाचा – निर्दयी! पर्यटकांच्या सेल्फीसाठी बछड्याचे पायच तोडले!