बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांची तातडीने बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी, अशी मागणीही मुंडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक ही उपस्थित होते.
पाळवदेची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी
बीड लोकसभेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस प्रशासन निष्क्रियेतेने आणि सत्ताधार्यांच्या मर्जीने काम करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच जिल्ह्यातील जनतेच्या मनात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा उमेदवार प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणार्या काँग्रेस कार्यकर्त्यास जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीसांसमक्ष मारहाण करण्यात आली. यातील आरोपींना तातडीने जामीन ही देण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळच्या सभेलाही सत्ताधार्यांच्या दबावापोटी जागा मिळू दिली नाही. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सोशल मिडियातून मोठ्या प्रमाणावर धमक्या देत आहेत. याच पार्श्वभूमीवर सदर तक्रार करण्यात आली.
जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आणि पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या आशीर्वादामुळे आणि निष्क्रियेतेमुळे या गंभीर घटना घडत असल्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी. जिल्हा अतिसंवेदनशील म्हणून घोषित करावा, स्थानिक पोलीसांचे सत्ताधार्यांशी असलेले लागेबांधे पाहता बाहेरील पोलीसांची कुमक बंदोबस्तासाठी ठेवावी. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि कुटुंबियास पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्याही त्यांनी केल्या आहेत.
वाचा – निवडणूक काळात गुन्हेगारांवर तीन टप्प्यात होणार कारवाई – अतिरिक्त आयुक्त
वाचा – …म्हणून रमजान महिन्यात लोकसभा निवडणूक; निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण