औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद टोकाला गेला आहे. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून जारी करण्यात आली. यामध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजी नगर करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असं बाळआसाहेब थोरात यांनी ठणकावून सांगतिलं आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयात नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस मान्यात देण्यात आली आहे. याची माहिती जारी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे. हाच धागा पकडत बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलं आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असं देखील थोरात म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असं आवाहन देखील बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला केलं आहे. दरम्यान, आता काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेवर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय @AmitV_Deshmukh pic.twitter.com/LqkMo2uXgi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 6, 2021
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
शिवसेनेच्या औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्याला काँग्रेसने आधिच विरोध केला आहे. असं असून देखील मुख्यमंत्री कार्यालयाने औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे. दरम्यान, यावरुन आता भाजपने देखील सेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.