आपल्या वाढदिवसाच्या रकमेपासून ते बॅंकेच्या खात्यातून शेवटच्या रूपयाची मदत सर्वसामान्यांकडून कोणताही हात आखडता न ठेवता होत आहे. पण आता कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने खुलासा केलेल्या एका घडामोडीमुळे राज्य सरकार आणि केंद्रातला वाद आता आणखी ताणला जाणार आहे. महाराष्ट्र आर्थिक संकटात असतानाच आता राज्यातला कॉर्पोरेट कंपन्यांचा निधी केंद्राकडे महाराष्ट्र भाजपसह केंद्रातील नेत्यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे. महाराष्ट्रातील उद्योपती तसेच इंडस्ट्रीयालिस्ट्ने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता पीएम केअर फंडला मदत करावी अशी मोठी स्पर्धा आता राज्यात सुरू झाली आहे.
कोरोनाविरोधातील लढाईत राज्य सरकार आर्थिक कोंडीत सापडले असतानाच आता मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने शुक्रवारी स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा स्टेट रिलिफ फंडमध्ये कंपन्यांमार्फत दिला जाणारा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा निधी हा म्हणून गणला जाणार नाही. कोरोना विरोधातील लढाईसाठी पीएम केअर्सची स्थापना केंद्रातून केल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने हे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रा समोरची आर्थिक संकटे आणखी गडद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच केंद्राने जीएसटी कम्पेनसेशनपोटीचे १६ हजार कोटी राज्याला न दिल्याने राज्याच्या समोरील संकटात आणखी भर पडली आहे.
ज्या कंपन्यांचा नफा ५ कोटी किंवा वार्षिक उलाढाल ही १००० हजार कोटी रूपये आहे, तसेच ५०० कोटी रूपयांचे उत्पन्न आहे अशा कंपन्यांना सरासरी २ टक्के निधी हा सीएसआर म्हणून देणे बंधनकारक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सने जाहीर केलेल्या एफएक्यू म्हणजे नियमित विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये या गोष्टींचा समावेश केला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा कोव्हिड १९ साठीचा राज्य आपत्कालीन फंड हा सीएसआर म्हणून गणला जाणार नाही असे स्पष्टीकरण मंत्रालयामार्फत देण्यात आले आहे. महाराष्ट्रात अशी उलाढाल असणाऱ्या जवळपास २०० हून अधिक कंपन्या आहेत. त्यामुळे या स्पष्टीकरणाचा फटका हा महाराष्ट्रातील निधीला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. आर्थिक संकटात असलेल्या राज्य सरकारचा मदतीचा मोठा पर्यायच पीएम केअर फंडाच्या माध्यमातून काढून टाकण्यात आला आहे.
DD नॅशनल वर दर 2-3मिनिटाला पंतप्रधान निधी साठी जाहिरात होत आहे
मग राज्य सरकारला dd सह्याद्री वर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहीरात करायला काय हरकत आहे?— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2020
पंतप्रधान निधी असतानाही वेगळा असा कोव्हिड १९ चा सामना करण्यासाठी पीएम केअर फंड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता विरोधकांनीही रान उठवले आहे. तर भाजपची सत्ता नसलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्याची यातून मोठी आर्थिक कोंडी करण्याचा हा एक प्रकार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या दुजाभावाबाबत ट्विटरवरून सवाल केला आहे. पीएम केअर फंडाच्या जाहिराती डीडी नॅशनलला सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. मग राज्य सरकारला डी डी सह्याद्रीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवाहनाची जाहिरात करायला काय हरकत आहे असा सवाल राऊत यांनी केला आहे. राऊतांपाठोपाठ आता रोहित पवार यांनीही ट्विट करत हा दुजाभाव असल्याची टीका केली आहे. असा भेदभाव योग्य नाही, केंद्राप्रमाणेच राज्यालाही निधीची गरज असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
CM केअरऐवजी केवळ PM केअरसाठी दिलेली मदतच CSR अंतर्गत धरण्याचा निर्णय धक्कादायक आहे. हे चुकून झालं असल्यास दुरूस्ती करावी. पण जाणीवपूर्वक केलं असेल तर केंद्र व राज्य असा भेदभाव योग्य नाही. अडचणीच्या काळात केंद्राप्रमाणेच राज्यालाही मदतीची गरज असते, हे लक्षात घ्यावं.@narendramodi
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 12, 2020
याआधी सामनातूनही संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या निधी गोळा करण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. सामना या मुखपत्रातून टीका केली होती. सरकारने विद्यमान खासदारांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन यांत 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांनीही पगारकपातीला स्वत:हून मान्यता दिली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार आधीच ‘पंतप्रधान केअर फंडा’त जमा केला आहे. याशिवाय खासदारांना मिळणारा वार्षिक निधीदेखील दोन वर्षांसाठी बंद केला जाणार आहे. अशा `शॉर्टकट’ने सरकार 10 हजार कोटी रुपये उभे करणार आहे असे टीकेचे अस्त्र त्यांनी आपल्या मुखपत्रातून सोडले होते. खासदारांचा निधी राज्यात वापरला जाणार नाही या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सवाल केला होता.
राज्यातील टाटा, अंबानी, अजीझ प्रेमजी, बजाज अशा उद्योगपतींकडून ५०० कोटी निधी प्राप्त झाला आहे. सार्वजनिक उपक्रम तसेच ऑईल कंपन्यांमार्फत जवळपास सात हजार कोटी रूपयांचा निधी जमा झाला आहे. बॉलिवुड सेलिब्रिटींनीही आपआपल्या परीने मदतीचा हात निधी पीएम केअर्स फंडसाठी दिला आहे. त्यामध्ये आमीर खान, शाहरूख खान यासारख्या बड्या सेलिब्रिटींनीही पीएम केअर फंडातच आपला आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.