राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पहाता राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली होती. मात्र काही तालुक्यांना यामधून वगळल्याची टीका होऊ लागली. हे लक्षात घेता सरकारने दुष्काळासाठी तालुक्याऐवजी मंडल हा घटक विचारात घेण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. राज्यमंत्री मंडळाची यासंदर्भात बैठक झाली याबैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुष्काळ परिस्थिती असलेल्या २९ तालुक्यांतील २०० मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
राज्यावर आर्थिक भार पडणार
केंद्राच्या निकषात बसणाऱ्या १५१ तालुक्यांतील लोकांना केंद्राच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. मात्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या मंडलातील लोकांना राज्य सरकारला मदत करावी लागणार आहे. सरकारवर किमान दीड ते दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२०० मंडलात दुष्काळ जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ तालुके, अहमदनगर जिल्ह्यातील ११ तालुके, बीड जिल्ह्यातील ११ तालुके, सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थीती असलेल्या तालुक्यांच्या यादीची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी टीका केली. तर अनेक तालुक्यातील ग्रामस्थांनी आमच्या तालुक्यांचा यादीत समावेश न केल्याने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सरकारकडून त्यापाठोपाठ २०० मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.