बेरोजगारीमुक्त, कर्जमुक्त, प्रदुषणमुक्त, दुष्काळमुक्त, सुरक्षित आणि सुशिक्षित महाराष्ट्र घडवायचा असून हे एकट्याचे काम नाही, त्यासाठी तुमची साथ गरजेची आहे, असे भावनिक आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अलिबाग येथील जन आशीर्वाद यात्रेतील विजय संकल्प मेळाव्यात केले.
जन आशीर्वाद यात्रा ही कोणाला आमदार बनवण्यासाठी काढलेली नाही. तर नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी काढलेली आहे. या निमित्याने गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधण्याचे काम सुरु आहे. तेथील प्रश्न समजून ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत. त्यासाठी आज मी तुमच्याकडे आलो आहे, असे आदित्य ठाकरे यांंनी सांगितले.
दरम्यान, संपूर्ण कोकण व रायगडात भगवेमय वातावरण असून रायगडात विरोधकांची अभद्र आघाडी झाली असली तरी शिवरायांच्या रायगडात विजयाचा भगवा फडकणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी पेण येथील जन आशीर्वाद यात्रेच्या वेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केला. तसेच लवकरच आपण रायगडात विजयी मेळाव्या करताही येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, राजिप सदस्य किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, सल्लागार बबन पाटील, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, संदीप तटकरे, सिध्देश कदम, श्रीकांत शिंदे, कामगार नेते सचिन अहिर, े यांच्यासह युवासेना महिला आघाडी व शिवसैनिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खड्यांच्या प्रश्न मार्गी लागेल
संपूर्ण महाराष्ट्रात खड्ड्यांचा प्रश्न आहे. विदर्भ मराठवाड्यातील रस्तेही यातून सुटलेले नाही. मुंबईत मेट्रोची कामे ठिकठिकाणी सुरु आहेत. काही ठिकाणी उड्डाणपुल बांधली जात आहेत. यामुळे मुंबईतील रस्तेही खराब झाले आहेत. सेलिब्रिटीच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनाही खड्ड्यांचा त्रास होतो आहे. याची सरकारला जाणीव आहे. लवकरच रस्त्याची कामे मार्गी लागतील. कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाची परिस्थितीही बिकट आहे. खासदार विनायक राऊत यांनी याबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. याबाबतही लवकरच कार्यवाही होईल, असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.