“आजचे निधर्मी असलेले शासन १०० निरपराध हिंदू फाशी गेले तरी चालतील; पण बेगडी निधर्मीत्व जपण्याचा प्रयत्न करत आहे. आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार्या शासनाच्या राज्यात हिंदू मार खात असून त्यांचे विविध स्तरांतून हिंदूचे खच्चीकरण सुरु आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या कृतज्ञतापर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रीय पत्रकार मंचाच्यावतीने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाजप राम मंदिराविषयी गप्प
संजय राऊत पुढे म्हणाले की, हिंदूंचे राज्य असताना सत्ताधारी राम मंदिराविषयी शब्द उच्चारात नाहीत. आज राज्यापासून ते केंद्रापर्यंत भाजपची सत्ता असताना राममंदिर उभारणीसाठी अध्यादेश का काढला जात नाही? गेली चार वर्षे सत्तेत असलेल्या आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार्या शासनाकडून समान नागरी कायद्यापासून ते राममंदिर उभारण्यापर्यंत अनेक विषयांमध्ये हिंदूंचा भ्रमनिरास झाला आहे. आजच्या राज्यकर्त्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व चालत नसल्याचे राऊत म्हणाले. तसेच अधिवक्ता पुनाळेकर यांनी अनेक हिंदूंचे निरपराधत्व सिद्ध केले असून त्यांनी त्यांचे कार्य पुढे असेच चालू ठेवावे, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले.
हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत अधिवक्ते लढतील – संजीव पुनाळेकर
कथित हिंदू आतंकवादाच्या नावाखाली अटक झालेले युवक निरपराध असतील, तर त्यांना आम्ही सोडवूच; पण जरी ते अपराधी असले, तरीही त्यांचे हिंदुत्व आणि हेतू यांविषयी शंका नसल्यामुळे आम्ही त्यांना विनामूल्य कायदेशीर साहाय्य देऊ, अशी हिंदू विधीज्ञ परिषदेची भूमिका संजीव पुनाळेकर यांनी मांडली.