कोल्हापूरच्या करवीरवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अखेर पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सर्व जातीच्या पगारी पुजाऱ्यांना या पदासाठी अर्ज करता येणार असल्याने नेमणूकीचे निकष बदलले आहेत. आजपासून पुढील तीन दिवस अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्यांच्या परीक्षा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. कोल्हापूरात पोलीस बंदोबस्तात अर्जदाराच्या परीक्षा पार पडत आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती त्यांच्या मुलाखती घेणार आहेत. अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी नेमण्याबाबत केलेल्या कायद्याच्या प्रस्तावानुसार पगारी पुजारीपदासाठी ११३ अर्ज दाखल झाले असून यामध्ये ६ महिलांचा समावेश आहे. २१ जूनपर्यंत या नेमणूक प्रक्रिया सुरू राहणार असून यासाठी सहा सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. जुलैअखेर नियुक्तीची अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
सर्व जातीय पुजारी नेमण्याचा ‘ऐतिहासिक’ निर्णय
अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा ऐतिहासीक निर्णय मंदिर प्रशासन समितीने घेतला आहे. मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाकडे दुर्लक्ष करून एकाही विद्यमान पुजाऱ्याने नियुक्तीसाठी अर्ज केलेला नाही.
‘पुजारी हटाओ…’ साठी संघर्ष
गेल्या वर्षी जून महिन्यात पुजारी अजित ठाणेकर यांनी अंबाबाईला पारंपरिक साडीऐवजी घागरा-चोली पेहराव परिधान केला होता. या प्रकारावरून भाविकांमध्ये संतप्त भावना उमटल्या होत्या. त्यानंतर अंबाबाई मंदिरात ‘पुजारी हटाओ संघर्ष समिती’ने आंदोलन करून पगारी पुजारी नेमण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. आठ महिन्याच्या पाठपुराव्यानंतर अखेर राज्य सरकारच्या विधी व न्याय खात्याने पुढाकार घेत पंढरपूरच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरातील सध्याचे पुजारी हटवून सरकारी पगारी पुजारी नेमण्यासंदर्भातील विधेयक विधानसभा व विधानपरिषदेत मांडले. हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले.
नेमणूक प्रक्रिया
- पगारी पुजारी परीक्षेसाठी ११३ उमेदवारांनी अर्ज केले
- यामध्ये १०७ पुरूष अर्जदार
- तर ६ महिलांचा समावेश आहे
- ५५ घराण्यांतील एकाही विद्यमान पुजाऱ्याने अर्ज केला नाही
- १९ ते २१ जून या कालावधीत मुलाखतीची प्रक्रिया
- वरिष्ठतेनुसार तीन टप्प्यांत मुलाखत प्रक्रियेचे नियोजन
- निवड प्रक्रियेसाठी सहा सदस्यांची नियुक्ती
- सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुलाखती
- उमेदवारांना एकूण २५ गुणांची परीक्षा
- परीक्षेला आलेल्यांपैकी ५५ उमेदवार निवडले जाणार
एकूण पदं
- ११ प्रमुख पुजारी
- ३५ सहायक पुजारी
पात्रतेचे निकष
- उमेदवाराने हिंदू असणे आवश्यक आहे
- उमेदवाराला गावातील पोलीस पाटलांकडून किंवा स्थानिक पोलिस ठाण्यातून वर्तणुकीचा दाखला घेणे बंधनकार आहे
- उमेदवाराला शाहू वैदिक स्कूलची मान्यता असणे आवश्यक आहे
- उमेदवार संपूर्ण शाकाहारी असावा, धर्मशास्त्राचा अभ्यासक असावा, पूर्वानुभव महत्वाचा असणार आहे
- पगारी पुजारी पदासाठी उमेदवाराला नित्य पूजाविधींसह मंत्रपठण, धार्मिक विधी, साडी पेहराव, नैवेद्य, सण उत्सवातील विशेष पूजा, पौरोहित्य आणि अंबाबाईच्या धार्मिक विधींचे ज्ञान असणे आवश्यक आहे
निवड समिती सदस्य
- डॉ. शिवदास जाधव (अभ्यासक)
- गणेश नेर्लेकर (तज्ज्ञ)
- विजय जाधव (विधी व न्याय विभाग प्रतिनिधी)
- शिवाजी जाधव (सदस्य देवस्थान समिती)
- संगिता खाडे (सदस्य देवस्थान समिती)
- देवस्थान समितीचे अध्यक्ष किंवा करवीर पिठाचे प्रतिनिधी