निफाडमधील एका शेतकऱ्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक हजार रुपये पाठवले आहेत. त्यांनी हे पैसे मनीऑर्डरच्या माध्यमातून पाठवले आहेत. कांद्याला केवळ दीड रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्यामुळे त्यांने असे केले आहे. कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन खर्चही मिळाला नाही. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीतून पिकवलेले सात क्विंटल कांद्ये विकून त्याची रक्कम पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डरमार्फत पाठवले आहे. त्यांच्या कांद्याला १५१ रुपये क्विंटल दर मिळाला होता. त्यामुळे या शेतकऱ्याने हे पैसे स्वत: जवळ न ठेवता मोदींकडे पाठवले आहेत.
हेही वाचा – कांदा-टोमॅटो कवडीमोल दराने; शेतकरी हताश
काय आहे नेमकं प्रकरण?
राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. या दुष्काळामध्ये राज्यातील शेतकरी भरडून निघाला आहे. यात आणखी भर म्हणून शेतीमालास भाव मिळत नाही. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे शेतीच्या मालाला नसणारा हमीभाव यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आपली ही व्यथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळावी यासाठी निफाडच्या एका शेतकऱ्याने आपल्या जमिनीत पिकवलेल्या सर्व कांद्यांची रक्कम पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर केली आहे. ही रक्कम एक हजार ६४ रुपये इतकी आहे. कांद्याच्या दरात झालेली घट बघून रविवारी निफाड तालुक्यात काही शेतकऱ्यांनी भर रस्त्यावर कांदे ओतून आपला रोष व्यक्त केला. परंतु, नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी वेगळी शक्कल लढवली. त्यांनी या परिस्थिताचा रोष गांधीगिरीतून व्यक्त केला. त्यांनी कांद्याच्या भरलेल्या ट्रकला बॅनर लावला, त्या बॅनरवर लिहिले की, ‘शेतकरीस व्यापारी बंधूंनो आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून, त्याच्याकडे कुणीही गांभार्याने पाहत नाही. या शेतकऱ्याच्या व्यथा पंतप्रधान नरेद्र मोदींना कळाव्यात या उद्देशाने मी आणलेल्या सर्व कांद्यांची रक्कम मनीऑर्डरद्वारे पंतप्रधानांना पाठविणार आहे’. आपण जे काही करत आहोत ते कुठल्या राजकीय हेतूने नाही, तर केवळ शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधानांना कळाव्यात हा त्यामागील उद्धेश आहे, असे साठे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – नवी मुंबईची एपीएमसी मार्केटमध्ये मंदी