शेतकर्यांच्या हितासाठी शिवसेना-भाजप सरकार यापुढील काळातही भरीव योगदान देणार आहे. विविध समस्यांनी जखडलेल्या शेतकर्यांना कर्जमुक्तीबरोबरच चिंतामुक्तही करू, त्याकरता युती सरकार कसोशीने प्रयत्न करील, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. आमच्याकडे आता सगळे हाऊसफुल्ल झाले आहे. सर्व चांगले लोक आमच्याकडे आले आहेत. धगधगते निखारे आज आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे तुमचा विस्तव पेटतोय का ते बघा. जे काही तुमचे पाच-दहा निवडून येतील ते तरी आमचे सरकार आल्यानंतर तुमच्यात राहतील का? याचा विचार करा, असे होणार असेल तर मग कशाला त्यांना मतं द्यायची. ही तुमच्या भविष्याची निवडणूक आहे.
त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ जनता राजा मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार वैभव पिचड, माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, शाळीग्राम होडगर, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. विखे यांनी जिल्ह्यातील सर्व जागांवर युतीचे उमेदवार विजय करू, असा विश्वास बोलून दाखवला.
तेजस जंगलात रमणारा माणूस
नगरमधील सभेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरेही उपस्थित होते. त्यावरून तेजस ठाकरे हे राजकारणात येणार असे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी, ‘तेजस हे सभा बघायला आले आहेत. ते जंगलात रमणारा माणूस आहेत’, असे सांगत तर्कवितर्कांना विराम दिला.