घरताज्या घडामोडीकर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! शेतकऱ्याचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण

Subscribe

साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या, असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा शुभारंभ करत महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहिर करण्यात आली. यावेळी परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

लाभार्थी शंभर टक्के समाधानी

या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले? किती कर्ज होते? कुठल्या पीकाला कर्ज घेतले होते? आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला? असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना विचारले. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना “मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या. आता केवळ एका थम्बवरच काम झाले”, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छा

परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरूड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्याने चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली. तसेच मुलीचे लग्न जमले आहे, अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठे दिले, अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरखून गेलेल्या विठ्ठलराव यांनी क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले.

योजनेच्या यशाचे श्रेय यंत्रणेला – मुख्यमंत्री

राज्यातील बळीराजांना कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या मोठ्या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसात झाली. याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ही योजना राबविताना आपण शेतकऱ्यांवर काही उपकार करीत आहोत अशी भावना ठेवू नका. शेतकऱ्यांचे आशिर्वाद आपण या माध्यमातून घेत आहोत. त्यामुळे आपण लाभार्थी आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काही ठिकाणी अंमलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकऱ्यांनी नाराज होवू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संमय ढळू देूऊ नका बळीराजाला दुखवु नका, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली.

- Advertisement -

शेतकरी आनंदात रहावा म्हणून योजना – उपमुख्यमंत्री

बळीराजा कर्जमुक्त व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे, यासाठी राज्यशासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली आहे. शेतकरी आनंदात रहावा त्याच्या मुलांचे शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावे, अशी आमची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३४ लाख ८३ हजार ९०८ शेतकरी खात्यांची माहिती प्राप्त झाली आहे. आज १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ३५ दिवसांमध्ये ३५ लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. तसेच १५ दिवसांच्या आत या माहितीचे लेखापरिक्षण झाले आहे. ही योजनेची सर्व अंमलबजावणी संगणकीय पद्धतीने होत आहे. शेतकऱ्यांच्या मान्यतेनंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्याला नोंद पावती दिली जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -